“भरकटलेल्या समाजाला वैचारिक दिशा देण्याचे काम साहित्यिकांनी करावे” - प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार
निटुर येथे तिसरे शिवार साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
मुख्य संपादक शिवाजी निरमनाळे
9890098685
लातूर :-
आज सामाजिक व बौद्धिक पर्यावरण स्वच्छ राहिलेले नाही. समाज भरकटत जात असल्याने पुन्हा एकदा मूल्यांची पेरणी करण्यासाठी भरकटलेल्या समाजाला वैचारिक दिशा देण्याचे काम साहित्यिकांनी करावे असे प्रतिपादन तिसऱ्या शिवार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ज्येष्ठ विचारवंत आणि वैचारिक साहित्याचे लेखक प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार यांनी केले आहे.
निलंगा तालुक्यातील निटुर येथे मराठवाडा साहित्य परिषद शाखा, लातूरच्यावतीने नुकतेच तिसरे शिवार साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. यावेळी विचारमंच्यावर उद्घाटक पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर, सत्कारमूर्ती डॉ.शेषराव मोहिते, स्वागताध्यक्ष प्राचार्य अनिल सोमवंशी, प्रमुख पाहुणे राजाभाऊ सोमवंशी, डॉ.जयद्रथ जाधव आणि प्राचार्य डॉ.दुष्यंत कटारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
साहित्य संमेलनाची सुरुवात संत तुकारामांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.
पुढे बोलताना प्राचार्य, डॉ.नागोराव कुंभार म्हणाले की, साहित्य हे समाजाच्या भरणपोषणासाठी मूलभूत विचारपीठ आहे. साहित्याने व्यक्ती, समाज व राष्ट्र उभे राहते. माणसांच्या शारीरिक गरजा भौतिक सुखाने पूर्ण होतात तर मनाच्या आणि चिंतनाच्या गरजा साहित्य पूर्ण करते. विज्ञान तंत्रज्ञानामुळे आपला विकास होतो. परंतु सामाजिकदृष्ट्या एकतेचा आणि समतेचा विकास होण्यासाठी साहित्यातून शाश्वत मूल्यांची पेरणी करणे आवश्यक असते. माणूस हीच एक मोठी विकास करणारी पायाभूत संस्था असून ती समाजाबरोबर राष्ट्राचा उद्धार करते म्हणून महात्मा ज्योतिराव फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कार्ल मार्क्स या व्यक्तींनी समाजाच्या उद्धाराकरीता आपले साहित्य आणि लेखणी स्पष्टपणे वैचारिक भूमिका घेऊन सतत तळपत ठेवलेली आहे. त्याप्रमाणेच मराठी साहित्यिकांनी सुद्धा आपली भूमिका "नाही रे" वर्गाच्या बाजूने उभी करून समाजात न्याय, नीती, समता, बंधुता व स्वातंत्र्य या शाश्वत मूल्यांची पेरणी करावी. साहित्य हे चिंतनाचे मूळ आहे. साहित्यातून समाज अनुभवनिष्ठपणे प्रगट झाला पाहिजे. साहित्य हे समाजाला व राष्ट्राला आधार देण्याचे काम करते. साहित्य हे देश व समाजाचे विघटन होताना ते जोडण्याची काम करते. साहित्य हे एक मार्गदर्शक तत्व आहे. ते आपल्या जगण्याला वैचारिक आधार देते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ग्रंथकार सभेला पत्र लेखन करून जी भूमिका घेतली होती ती भूमिका आजच्या साहित्यिकांनी घेतली पाहिजे. समाजाच्या व्यथा, वेदना आणि दुःखाचा शोध घ्या आणि आपल्या साहित्याला मूल्यांचा आत्मा द्या असेही ते म्हणाले.
यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर म्हणाले की, शिवारापर्यंत जाऊन गावातील माणसांचे प्रश्न घेऊन शिवार साहित्य संमेलन लोकांशी संवाद साधत आहे. आजच्या काळात माणसा-माणसातील संवाद कमी होत असून तो संवाद डिजिटल तंत्रज्ञानाने आपल्यापासून हरवून घेतलेला आहे. साहित्य हे पुन्हा एकदा संवाद साधण्यासाठी मदत करते म्हणून हे संमेलन महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम आणि शेक्सपियर एकाच काळातले असताना सुद्धा शेक्सपियर या इंग्रजी कवीला इंग्रजी माणसाने जितके समजून घेतले तितकेच जगप्रसिद्ध राजा छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकारामांना आपण समजून घेऊ शकलो नाही. याची कारण म्हणजे आपले संवाद, चिंतन, आत्मचिंतन आणि समूहात मिसळणे हे हळूहळू संपत चाललेले आहे. आजच्या पिढीला उत्सवी स्वरूप आलेले आहे. ते टाळून साहित्यामधून घडणारा संवाद समजून घेतला पाहिजे. आजचा समाज हा आत्मप्रेमग्रस्त झालेला आहे. परंतु साहित्याच्या माध्यमातून लोकसंवाद घडून येतो. म्हणून तरुण लेखकांनी शेती, शेतकरी, आदिवासी आणि नष्ट होत जाणारे पर्यावरण याविषयी लिहिले पाहिजे. त्यासाठी अशी छोटी छोटी संमेलने गावागावातून भरवली पाहिजे.
या साहित्य संमेलनात ज्येष्ठ कादंबरीकार डॉ शेषराव मोहिते यांनी ४२ वे मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.मोहिते म्हणाले की, लातूर ही साहित्यिकांची आणि चळवळीची भूमी आहे. या भूमीत मराठवाडा साहित्य परिषद शाखा, लातूरने तीन संमेलन घेऊन साहित्याची चळवळ लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केलेला आहे.साहित्याच्या ऊर्जेसाठी अशी संमेलने झाली पाहिजे.यामधून साहित्य चळवळीला बळ प्राप्त होते.
स्वागताध्यक्ष प्राचार्य अनिल सोमवंशी यांच्यावतीने राजाभाऊ सोमवंशी यांनी भूमिका मांडली. निटूरच्या भूमीत हे संमेलन होत आहे. ही भूमी सादनाथ महाराजांची नाथ परंपरा, वारकरी परंपरा, वीरनाथ संस्थान औसा येथील परंपरा आणि सुफी परंपरेचा वारसा जपणारे गाव आहे. प्राचीन काळापासून साहित्य विचार या भूमीत जोपासले आहेत. अत्यंत कमी वेळेत हे संमेलनाचे नियोजन केले. साहित्याची चर्चा माझ्या गावात घडावी म्हणून हे संमेलन घेतले. या निमित्ताने सर्वांचे मी स्वागत करतो आहे. उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूरचे अध्यक्ष डॉ.जयद्रथ जाधव यांनी केले. या संमेलनाच्या आयोजनाची भूमिका सांगितली.
यावेळी रमेश चिल्ले, सुरेंद्र पाटील, रामदास कांबळे, पत्रकार राजाभाऊ सोनी, पत्रकार माधव शिंदे, मोहिब कादरी, द.मा.माने, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे अध्यक्ष बालाजी जाधव, योगीराज माने, विलास सिंदगीकर, संतोष सोमवंशी, नयन राजमाने, विद्या बयास ठाकूर, उषा भोसले, प्रकाश घादगिने, बी.आर.पाटील, राजेसाहेब कदम, अनिल चवळे, बालाजी मुंडे, नामदेव कोद्रे, रमेश हाणंमते, चंद्रकांत कदम, सविता जाधव, सोमवंशी भाग्यश्री, शिवाजी सूर्यवंशी, शरद कांबळे, जाधव जितेंद्र, जाधव सतीश, इंगळवाड विष्णुदास यांच्या सह निटूर ग्रामस्थांसह रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक सौताडेकर यांनी आणि आभार प्राचार्य डॉ.दुष्यंत कटारे यांनी मानले.

Post a Comment
0 Comments